आपली मुलं कशी बनावीत असं तुम्हांला वाटतं - पुस्तकी किडे, दूरचित्रवाणीचे/ संगणकाचे गुलाम आणि उध्दट - गर्विष्ट की निरोगी आणि अष्टपैलू All-rounder? खुरटलेली, रोगट, विक्षीप्त, चिडखोर की "अष्टपैलू" म्हणजेच सर्वांगीण/ ३६० अंशातून विकास झालेली?
मुलांना मागेल ते तातडीनं विकत आणून दिलं म्हणजे संपली आपली जबाबदारी? आहे आपल्याला थोडा वेळ मुलांच्या गप्पा ऐकायला, त्याच्याबरोबर प्रकल्प बनवायला, प्रसंगी त्यांना कडक समजूत द्यायला?
मुलांचा नैसर्गिक कल ऒळखून त्यांना कला/ क्रिडा अश्या क्षेत्रातही पुढं जाउ द्यायचंय की आपल्या इच्छांची सक्ती करायचीये? आज प्रत्येकालाच का बनवायचंय Doctor/ Engineer/ MBA आणि पाठवायचंय अमेरिकेत कायमस्वरुपी dollars कमवायला?
मुलांपुढे कोणाचे आदर्श असावेत - स्वार्थी आणि आप्पलपोटी राजकारण करणारे मालिकांमधले अभिनेत्यांचे की इन्फ़ोसीसच्या नारायण मुर्तींचे?
हा असणार आहे आपला निर्णय! सर्वस्वी आपलाच निर्णय!!!
खरं तर यशाची निसंदिग्ध व्याख्या करता आली पाहिजे... गुणांची टक्केवारीच म्हणजेच सगळं काही का! बुद्धिमत्ता म्हणजे काय फ़क्त अभ्यासातली पोपटपंची? मुलांमधला निरागसपणा, नाविन्याची ओढ, जिद्न्यासा दाबून टाकण्याच्या मागे आपण का लागतो? वर्गात पहिला येणार्या, पण रस्त्यावर कोणाला पत्ता विचारायला किंवा घरी आलेल्या पाहुण्यांशी २ वाक्यं बोलायला लाजणार्या मुलाच्या बुद्धिमत्तेचा काय फ़ायदा!

(Picture: My nephews Tanmay, Sameer and Ishaan; 03Nov05)
आज मुलं असायला पाहिजेत ना निरोगी मनोव्रुत्तीची, smart आणि mature! चांगले छंद, अवांतर वाचन, छात्र प्रबोधन सारखी उत्क्रुष्ठ मासिकं, Discovery/ National Geographic/ Internet जगाचं दालनं मोकळी उघडतील...
भरपूर खेळ खेळायची आवड निर्माण झाली पाहिजे. खेळ लावतात शारीरिक कस, शिकवतात गटात काम करायला आणि प्रसंगी तडजोड करायलाही; खेळ शिकवतात पराभव स्विकारण्याचं धैर्य, नेत्रुत्वगुण, निर्णयक्षमता अंगी बाणायला... जाउ द्या मुलांना डोंगर - द-यांमध्ये मुक्तपणे भटकायला. शिवरायांचे गड-किल्ले त्यांना सांगतील काय असते स्वातंत्र्याचं मूल्य, घामेजल्यावर - दमल्यावर गोड जुनं टाकं शिकवेल पाण्याचं मोल, क्रुतद्न्यता वाटेल आपल्या पूर्वजांची ज्यांनी घेतले कष्ट अश्या उंचीवर टाकं खोदण्याचे! डोंगरमाथ्यावरचं एकुलतं झाड बघून दिठी सुखावेल, दरीची खोली बघून छातीचा ठोका चुकेल, कातळकड्यांच्या राकट रौद्रभीषण भव्यतेनं भारावतील, अथांग पसरलेल्या सिंधूसागराची गाज ऐकून थरारून जातील......
ह्या सार्या गोष्टी मुलांचं अनुभवविश्व सम्रुद्ध बनवतील. कणखरपणा, धीटपणा, धाडसीव्रुत्ती, धडाडी असं खूप काही शिकवून जातील. बुद्धिबळासारखा एखादा बैठा खेळ सुद्धा शिकवतो डाव-प्रतिडाव खेळायला, प्रतिस्पर्ध्याच्या चाली ऒळखून त्यावर प्रतिहल्ला करण्याचं कौशल्य! व्यावहारिक चातुर्य, सामान्य द्न्यान, साहित्य, खेळ, निबंध, वक्त्रुत्व, चित्रकला हे सारं सारं हवंच रोजच्या अभ्यासाच्या जोडीला!
हे सगळं ठीक आहे, मग काय केलं पाहिजे आपण?
शिक्षा नको, शिस्त हवी!
जबाबदार पालकत्व हवे, पण त्याचा ओव्हरडोस नको!
मुलांमध्ये समाजात वावरण्याकरता गुण बाणायला हवेत!
आपल्या कामातल्या ताणतणावाचा मुलांवर राग कशाला काढायचाय!
गुण-दोष काढत बसायला नको, ते सुधारता कसं येईल आणि सकारात्मक, खेळकर व्रुत्ती कशी बनेल, याकडं लक्ष हवं!
आपण यालाच संस्कार म्हणत आलो, हल्ली कोणी याला म्हणेल "Positive Parenting"! काहीही म्हणा हो, पण शेवटी निर्णय आपलाच आहे ना......
बोला, आपल्या पाल्याला बनवायचंय सखाराम गटणे की सचिन तेंडुलकर?
(वरील लेखन श्री साईनाथ बालक मंदिर, चिंचवड, पुणे यांच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त काढण्यात आलेल्या स्मरणिकेकरता केलं आहे.)